(१७ सप्टेंबर रोजी लिहिलेला पहिला लेख)
आज माझा वाढदिवस. आणि आज नेमकी अजून एका चित्र प्रदर्शनाची सांगता झाली. मागे वळून बघताना काही त्या वेळी साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींनी आयुष्याला केवढी मोठी कलाटणी मिळाली या बद्दल एकीकडे गंमतही वाटते, आणि त्याच वेळी त्या गोष्टी त्या वेळी घडल्या नसत्या तर ... या विचारानं अस्वस्थही होतं .
आज मला माझ्या आयुष्यातली अशीच एक साधी सुधी गोष्ट आठवली. १० वर्षाचा होतो तेव्हा. पाचव्या यत्तेत. आज कालची पाचव्या यत्तेतली मुलं जेवढी ओव्हरस्मार्ट असतात त्या वरून अजिबात मला डोळ्यापुढे आणू नका बरं का! आम्ही सगळे त्या वेळी मुलखाचे बावळट होतो. आज कालच्या मुलांना जेवढं exposure असतं त्याच्या २-३ % सुद्धा आम्हाला नसेल. खाकी हाफ पॅन्ट आणि मळका पांढरा शर्ट, ज्यांना कधीही इस्त्रीचा स्पर्श झालेला नसे. कॉलेज मध्ये जाई पर्यंत आम्ही डिओड्रंट चं तोंड पाहिलं नाही. जास्त अक्कल नसल्यामुळे आंघोळ करणे ही ग्रूमिंगची परमावधी होती. आणि फक्त मुलांची शाळा असल्यामुळे जास्त नट्टापट्टा करण्यासाठी काही इन्स्पिरेशन पण नव्हतं !
तर सांगायाची गोष्ट हि, की आज मला बऱ्याचं लोकांचे फोन आले वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. त्यात काही लोक असेही होते जे फेसबुक वर माझ्या पोस्ट्स नेहमी बघतात, पण नेहमी नेहमी भेटी -बोलणं होत नाही. अर्थात सगळेच आपापल्या कामांत व्यस्त असतात , त्या मुळे त्यात कोणाचीच चूक नाही. पण सांगायचा मुद्दा हा , कि त्यातल्या बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला - "काय रे , तू अजून हि जॉब करतोस IT मध्ये का फुल टाइम चित्रकला?", आणि मला एकदम जाणवलं , की लोकांना एवढं वाटण्याइतपत आपण चित्रकलेत बुडालेले आहोत.
त्या वेळी, इयत्ता पाचवी मध्ये मी जेव्हा नुकताच प्रवेश केला होता, तेव्हा मला अजिबात चित्रकला आवडायची नाही हे मी सांगितलं तर लोकांना आश्चर्य वाटतं.
पाचवी मध्ये येई पर्यंत चित्रकलेचा तास जवळ आला की मला धडकी भरायची. याची कारणं दोन : एक म्हणजे माझी अशी समजूत होती कि मला चित्रकला अजिबात जमत नाही, आणि दुसरं कारण म्हणजे ती समजूत अगदी खरी होती! मला खरंच ते काम अजिबात जमत नसे! दर वेळी चित्र काढताना माझ्या मनात फक्त भीती असायची, की मी काढतोय वाघ, आणि बघणारा हमखास विचारणार, की या कबुतराला पंख का नाही काढले! त्या वेळी कुणी मला पुढे जाऊन चित्रकला हे माझ्यासाठी alternate करिअर होऊ शकेल असं म्हणलं असतं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. पण त्या वेळी एका साध्या सुध्या वाटणाऱ्या घटनेनं सगळ्याच प्रकाराला कलाटणी दिली.
झालं असं , की पाचवीच्या इतिहासाच्या पुस्तकात राणा प्रताप वरती एक धडा होता. पाचवीच्या वर्षाची ती सुरुवातच होती, आणि इतिहासाची अजून एकही परीक्षा न झाल्यामुळे आमचा इतिहासातला रस अजून शिल्लक होता. म्हणजे आमच्या शिक्षकांना सनावळ्यामध्ये तो इतिहास गाडून त्यातला सगळा रस घालवायची संधी मिळालेली नव्हती. त्या धड्यामध्ये राणा प्रतापचं एक चित्र होतं. एकदम करारी मुद्रा, भारदस्त शरीर , चिलखत आणि पोलादी शिरस्त्राण असा पेहराव. त्या दिवशी मी सकाळी वर्गात आलो तर माझ्या डेस्कपाशी पोरांची ही गर्दी ! मला काय कळेना आपण एकदम का डिमांडमध्ये! जवळ गेल्यावर कळलं कि हि डिमांड मला नव्हती. माझ्या शेजारी बसणाऱ्या मुलानं ते राणा प्रतापचं चित्र त्याच्या स्केचबुक मध्ये कॉपी करून आणलं होतं, आणि ते बघून सगळी पोरं फुल इम्प्रेस झाली होती.
खरं सांगायचं तर माझी जरा जळजळच झाली. आपला शेजारी एवढा छान चित्र काढतो आणि आपल्याला हातात पेन्सिल धरणं म्हणजे पण टेन्शन येतं, काय अर्थ आहे का याला! तरीपण कसनुसं बळेबळे त्याचं अभिनंदन करून मी स्थानापन्न झालो. पण ते चित्र पहिल्यापासून मला सारखं वाटत होतं कि हे आपल्या वहीत पण असायला पाहिजे. शेवटी माझा इगो गिळून मी माझ्या शेजाऱ्याला विचारलं, "काय रे, मला पण माझ्या वहीत हे चित्र काढून देशील का?". त्यावर त्यानं (झुरळाला न घाबरणारे लोक) झुरळाला झटकून टाकण्याआधी ज्या नजरेनं बघतात तसं माझ्याकडे पाहिलं. मला माझं उत्तर मिळालं आणि मी खजील होऊन परत मान वर केली नाही.
आता या घटनेची जेव्हा आठवण होते तेव्हा लक्षात येतं कि त्याची नाही म्हणण्यात काहीच चूक नव्हती. मी त्याच्याकडून परत ते चित्र माझ्यासाठी काढण्याची अपेक्षाच चूक होती. पण हे कळण्याची अक्कल कमी होती, आणि माझा इगो फार मोठा होता, जो त्या वेळी जरा जोरातच दुखावला गेला. त्या वेळी जर त्यानं मला ते चित्र काढून दिलं असतं तर कदाचित मी आजही पेन्सिलला घाबरून जगलो असतो. पण तो इगो दुखावला जाणं हि इष्टापत्ती ठरली.
मी शाळा सुटल्यावर घरी गेलो आणि तडक ते इतिहासाचं पुस्तक समोर घेऊन बसलो. माझ्या डोळ्यापुढे एकच लक्ष्य होतं. ते चित्र मी काढणार. किती पण वेळ लागुदेत. २-३ तास , किती वेळ बसलो ते आठवत पण नाही. किती चुका केल्या तेही आठवत नाही. एवढंच आठवतं कि माझ्या शेजाऱ्यापेक्षा कितीतरी चांगलं चित्र तयार झालं. दुसऱ्या दिवशी विजयी मुद्रेनं ते शाळेत घेऊन गेलो आणि मनसोक्त कौतुक करून घेतलं. त्या दिवशी मेंदूतला एक मेगाब्लॉक निघाला, आणि चित्रकलेनं अस्मादिकांच्या आयुष्यात चंचुप्रवेश केला. त्यानंतर या चित्रकलेनं आत्तापर्यंत कायम साथ दिली. शाळा आणि कॉलेजमधले कंटाळवाणे तास असोत, की मित्रांची (आणि मैत्रिणींची) वाट बघणं असो, की ऑफिसच्या न संपणाऱ्या मीटिंग असोत!
पण या सगळ्याची सुरुवात झाली ती त्या एका क्षुल्लक वाटणाऱ्या प्रसंगानं, आणि त्यातून माझ्या दुखावलेल्या इगोनं. खरं तर इगो हा दुर्गुण समजला जातो. पण त्याला योग्य दिशा दिली तर तोच इगो गुणी होतो. आणि हे सगळ्याच भावनांना लागू नाही काय! असो, त्या बद्दल परत कधी बोलेन.
तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्यात का ज्यानी अशी कलाटणी दिली? जरूर शेअर करा. पुन्हा भेटूच या कट्ट्या वर. तो पर्यंत शिरीषकडून सायोनारा!
आज माझा वाढदिवस. आणि आज नेमकी अजून एका चित्र प्रदर्शनाची सांगता झाली. मागे वळून बघताना काही त्या वेळी साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींनी आयुष्याला केवढी मोठी कलाटणी मिळाली या बद्दल एकीकडे गंमतही वाटते, आणि त्याच वेळी त्या गोष्टी त्या वेळी घडल्या नसत्या तर ... या विचारानं अस्वस्थही होतं .
आज मला माझ्या आयुष्यातली अशीच एक साधी सुधी गोष्ट आठवली. १० वर्षाचा होतो तेव्हा. पाचव्या यत्तेत. आज कालची पाचव्या यत्तेतली मुलं जेवढी ओव्हरस्मार्ट असतात त्या वरून अजिबात मला डोळ्यापुढे आणू नका बरं का! आम्ही सगळे त्या वेळी मुलखाचे बावळट होतो. आज कालच्या मुलांना जेवढं exposure असतं त्याच्या २-३ % सुद्धा आम्हाला नसेल. खाकी हाफ पॅन्ट आणि मळका पांढरा शर्ट, ज्यांना कधीही इस्त्रीचा स्पर्श झालेला नसे. कॉलेज मध्ये जाई पर्यंत आम्ही डिओड्रंट चं तोंड पाहिलं नाही. जास्त अक्कल नसल्यामुळे आंघोळ करणे ही ग्रूमिंगची परमावधी होती. आणि फक्त मुलांची शाळा असल्यामुळे जास्त नट्टापट्टा करण्यासाठी काही इन्स्पिरेशन पण नव्हतं !
तर सांगायाची गोष्ट हि, की आज मला बऱ्याचं लोकांचे फोन आले वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. त्यात काही लोक असेही होते जे फेसबुक वर माझ्या पोस्ट्स नेहमी बघतात, पण नेहमी नेहमी भेटी -बोलणं होत नाही. अर्थात सगळेच आपापल्या कामांत व्यस्त असतात , त्या मुळे त्यात कोणाचीच चूक नाही. पण सांगायचा मुद्दा हा , कि त्यातल्या बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला - "काय रे , तू अजून हि जॉब करतोस IT मध्ये का फुल टाइम चित्रकला?", आणि मला एकदम जाणवलं , की लोकांना एवढं वाटण्याइतपत आपण चित्रकलेत बुडालेले आहोत.
त्या वेळी, इयत्ता पाचवी मध्ये मी जेव्हा नुकताच प्रवेश केला होता, तेव्हा मला अजिबात चित्रकला आवडायची नाही हे मी सांगितलं तर लोकांना आश्चर्य वाटतं.
पाचवी मध्ये येई पर्यंत चित्रकलेचा तास जवळ आला की मला धडकी भरायची. याची कारणं दोन : एक म्हणजे माझी अशी समजूत होती कि मला चित्रकला अजिबात जमत नाही, आणि दुसरं कारण म्हणजे ती समजूत अगदी खरी होती! मला खरंच ते काम अजिबात जमत नसे! दर वेळी चित्र काढताना माझ्या मनात फक्त भीती असायची, की मी काढतोय वाघ, आणि बघणारा हमखास विचारणार, की या कबुतराला पंख का नाही काढले! त्या वेळी कुणी मला पुढे जाऊन चित्रकला हे माझ्यासाठी alternate करिअर होऊ शकेल असं म्हणलं असतं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. पण त्या वेळी एका साध्या सुध्या वाटणाऱ्या घटनेनं सगळ्याच प्रकाराला कलाटणी दिली.
झालं असं , की पाचवीच्या इतिहासाच्या पुस्तकात राणा प्रताप वरती एक धडा होता. पाचवीच्या वर्षाची ती सुरुवातच होती, आणि इतिहासाची अजून एकही परीक्षा न झाल्यामुळे आमचा इतिहासातला रस अजून शिल्लक होता. म्हणजे आमच्या शिक्षकांना सनावळ्यामध्ये तो इतिहास गाडून त्यातला सगळा रस घालवायची संधी मिळालेली नव्हती. त्या धड्यामध्ये राणा प्रतापचं एक चित्र होतं. एकदम करारी मुद्रा, भारदस्त शरीर , चिलखत आणि पोलादी शिरस्त्राण असा पेहराव. त्या दिवशी मी सकाळी वर्गात आलो तर माझ्या डेस्कपाशी पोरांची ही गर्दी ! मला काय कळेना आपण एकदम का डिमांडमध्ये! जवळ गेल्यावर कळलं कि हि डिमांड मला नव्हती. माझ्या शेजारी बसणाऱ्या मुलानं ते राणा प्रतापचं चित्र त्याच्या स्केचबुक मध्ये कॉपी करून आणलं होतं, आणि ते बघून सगळी पोरं फुल इम्प्रेस झाली होती.
खरं सांगायचं तर माझी जरा जळजळच झाली. आपला शेजारी एवढा छान चित्र काढतो आणि आपल्याला हातात पेन्सिल धरणं म्हणजे पण टेन्शन येतं, काय अर्थ आहे का याला! तरीपण कसनुसं बळेबळे त्याचं अभिनंदन करून मी स्थानापन्न झालो. पण ते चित्र पहिल्यापासून मला सारखं वाटत होतं कि हे आपल्या वहीत पण असायला पाहिजे. शेवटी माझा इगो गिळून मी माझ्या शेजाऱ्याला विचारलं, "काय रे, मला पण माझ्या वहीत हे चित्र काढून देशील का?". त्यावर त्यानं (झुरळाला न घाबरणारे लोक) झुरळाला झटकून टाकण्याआधी ज्या नजरेनं बघतात तसं माझ्याकडे पाहिलं. मला माझं उत्तर मिळालं आणि मी खजील होऊन परत मान वर केली नाही.
आता या घटनेची जेव्हा आठवण होते तेव्हा लक्षात येतं कि त्याची नाही म्हणण्यात काहीच चूक नव्हती. मी त्याच्याकडून परत ते चित्र माझ्यासाठी काढण्याची अपेक्षाच चूक होती. पण हे कळण्याची अक्कल कमी होती, आणि माझा इगो फार मोठा होता, जो त्या वेळी जरा जोरातच दुखावला गेला. त्या वेळी जर त्यानं मला ते चित्र काढून दिलं असतं तर कदाचित मी आजही पेन्सिलला घाबरून जगलो असतो. पण तो इगो दुखावला जाणं हि इष्टापत्ती ठरली.
मी शाळा सुटल्यावर घरी गेलो आणि तडक ते इतिहासाचं पुस्तक समोर घेऊन बसलो. माझ्या डोळ्यापुढे एकच लक्ष्य होतं. ते चित्र मी काढणार. किती पण वेळ लागुदेत. २-३ तास , किती वेळ बसलो ते आठवत पण नाही. किती चुका केल्या तेही आठवत नाही. एवढंच आठवतं कि माझ्या शेजाऱ्यापेक्षा कितीतरी चांगलं चित्र तयार झालं. दुसऱ्या दिवशी विजयी मुद्रेनं ते शाळेत घेऊन गेलो आणि मनसोक्त कौतुक करून घेतलं. त्या दिवशी मेंदूतला एक मेगाब्लॉक निघाला, आणि चित्रकलेनं अस्मादिकांच्या आयुष्यात चंचुप्रवेश केला. त्यानंतर या चित्रकलेनं आत्तापर्यंत कायम साथ दिली. शाळा आणि कॉलेजमधले कंटाळवाणे तास असोत, की मित्रांची (आणि मैत्रिणींची) वाट बघणं असो, की ऑफिसच्या न संपणाऱ्या मीटिंग असोत!
पण या सगळ्याची सुरुवात झाली ती त्या एका क्षुल्लक वाटणाऱ्या प्रसंगानं, आणि त्यातून माझ्या दुखावलेल्या इगोनं. खरं तर इगो हा दुर्गुण समजला जातो. पण त्याला योग्य दिशा दिली तर तोच इगो गुणी होतो. आणि हे सगळ्याच भावनांना लागू नाही काय! असो, त्या बद्दल परत कधी बोलेन.
तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्यात का ज्यानी अशी कलाटणी दिली? जरूर शेअर करा. पुन्हा भेटूच या कट्ट्या वर. तो पर्यंत शिरीषकडून सायोनारा!
No comments:
Post a Comment